जळगाव मिरर | १७ जुलै २०२६
जामनेर तालुक्यातील शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) पदावरील जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्या जागी ग्रामसेवक किंवा तलाठी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात गुरुवार, १६ जुलै रोजी जामनेरचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मनसे विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जामनेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी शिक्षकांवरील अतिरिक्त प्रशासकीय कामकाजामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद केले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या अनेक शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी असल्याने त्यांचा मोठा वेळ निवडणूकविषयक कामांमध्ये जातो. परिणामी विद्यार्थ्यांना अपेक्षित वेळ आणि दर्जेदार अध्यापन मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना पूर्णवेळ शाळेत राहून अध्यापन करता यावे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी त्यांना बीएलओच्या जबाबदारीतून मुक्त करणे आवश्यक आहे.
याऐवजी गावातील ग्रामसेवक किंवा तलाठी यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामसेवक आणि तलाठी यांचा गावातील नागरिकांशी सातत्याने संपर्क असल्याने त्यांना मतदारांची अचूक माहिती असते. त्यामुळे मतदार यादी अद्ययावत ठेवणे, पडताळणी करणे आणि निवडणूकविषयक कामे अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षकांना अध्यापनासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आशुतोष पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, पहूर अध्यक्ष रतन देशमुख, तालुका उपाध्यक्ष वाल्मीक कोळी, तालुका सरचिटणीस रामेश्वर भोसले, परशुराम चिखलीकर, सतीश विजय पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.




















