
जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२५
रेल्वेची धडक लागल्याने खंडेराव नगरच्या रेल्वे पुलावरुन नाल्यात कोसळल्याने मनोज माणिकराव देशमुख (वय ४८, रा. शिवकॉलनी) यांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवार दि. २६ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. मयताच्या खिशात चिठ्ठी मिळून आली असून त्यामध्ये नाव आणि आत्महत्या करीत असल्याबाबतचा मजकूर लिहीला आहे. परंतू तो वाचता येत नसली तरी पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील शिवकॉलनी परिसरात मनोज देशमुख हे वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास ते खंडेराव नगराजवळील रेल्वे पुलावरुन जात असतांना त्यांना रेल्वेची धडक लागून ते पुलावरुन थेट वाहणाऱ्या नाल्यात कोसळले. ही घटना त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी घटनेची माहिती आपदा मित्र जगदिश बैरागी यांना दिली. त्यांनी याबाबत रामानंद नगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह नाल्यातून बाहेर काढत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ शरद वंजारी हे करीत आहे.
पुलावरुन पडलेल्या मनोज देशमुख यांचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मयत देशमुख हे शिवकॉलनी परिसरात राहत असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची ओळख पटवली. मयत देशमुख यांच्या खिशात एक चिट्ठी मिळून आली. यामध्ये त्यांनी तोडक्या मोडक्या अक्षरात स्वतः चे नाव आणि आपण आत्महत्या करीत असून त्याला कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहीले आहे. पोलिसांनी ती सुसाईट नोट जप्त केली आहे.




















