
जळगाव मिरर । २५ सप्टेंबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील आरक्षणाचा वाद मोठा वाढत असताना आता परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण मराठवाडा हादरला आहे. ओबीसी आरक्षण संपणार असल्याच्या अफवेमुळे तणावग्रस्त झालेल्या 22 वर्षीय कुमार नारायण आघाव या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. कुमार हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता, तर त्याला चार बहिणी आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या मृत्यूने संपूर्ण आघाव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावभर हळहळ व्यक्त होत असून समाजमन हादरले आहे.
कुमार आघावने शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करताना त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत त्याने स्पष्टपणे लिहिले होते की, “ओबीसी आरक्षण गेले असे मी समाजात ऐकत आलोय. माझ्या डोक्यात सतत तोच विचार सुरू होता. आमच्या तरुण बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे, म्हणून मी माझे जीवन संपवतो.” या चिठ्ठीतून त्याच्या मानसिक तणावाची प्रचीती येते. ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे तरुणाईमध्ये किती मोठी घालमेल झाली आहे, याचे हे धक्कादायक उदाहरण आहे.
23 सप्टेंबर रोजी कुमार परभणीहून गावाकडे आला होता. घरी आल्यानंतर त्याने आईला शेतात जातो असे सांगितले आणि घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. घरच्यांनी शोधाशोध सुरू केली असता शेतात लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तत्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली. बोरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
कुमार आघाव हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर प्रचंड आघात झाला आहे. कुटुंबातील चार बहिणी आणि आईवडील या घटनेनंतर अत्यंत दुःखात बुडाले आहेत. या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची जाणीव गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून त्यांचा संसार उभा राहू शकेल. युवकाचा मृत्यू हा समाजातील संभ्रम आणि चुकीच्या माहितीच्या फैलावाचा परिणाम असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
या घटनेनंतर परभणी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी आणि गावकऱ्यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे की, ओबीसी आरक्षणाबाबत जनतेमध्ये असलेला संभ्रम तात्काळ दूर करावा. चुकीच्या माहितीमुळे तरुणाई आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेत आहे, हे थांबवण्यासाठी समाजाला योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कुमार आघावच्या आत्महत्येने फक्त एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही तर संपूर्ण समाजमनाला हादरा बसला आहे.




















