
जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२५
तालुक्यातील भादली बु. महात्मा गांधी विद्यालय भादली येथे केंद्र भादलीची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद खेडीमेडीच्या वातावरणात आणि प्रेरणादायी चर्चासत्रांमधून उत्साहात पार पडली. परिषदेमध्ये शिक्षण विभागातील विविध अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी तथा शाळा पोषण अधिकारी मा. श्री. अजित तडवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शैक्षणिक विस्तार अधिकारी मा. श्री. शांताराम कुंभार, मा. श्री. जितेंद्र चिंचोले आणि मा. श्री. विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये निपुण भारत अंतर्गत उपक्रम, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, तसेच अध्ययन समृद्धी कार्यक्रमावर सविस्तर चर्चा झाली.
केंद्रप्रमुख श्रीमती वैशाली बाविस्कर यांनी ‘मुले देवाघरची फुले’ या संकल्पनेवर भाष्य करत शाळेचे महत्व अधोरेखित केले. केंद्र भादलीने जिल्हा स्तरावर तिसरा क्रमांक मिळवला असून, यापुढे प्रथम क्रमांकासाठी सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत करत निपुण विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रभावी कार्यपद्धती राबवण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान कार्यक्रम, Mastery goals, PM eVidya शैक्षणिक वाहिनी, शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन आदी विषयांवर सादरीकरण झाले. परिसरातील भोलाणे, कडगाव, भादली, शेळगाव, कानसवाडे, देऊलवाडे आणि सुजदे येथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक परिषदेला उपस्थित होते.
प्रास्ताविक केंद्रप्रमुख वैशाली बाविस्कर यांनी तर सूत्रसंचालन श्री विनोद सावळे यांनी केले. आभारप्रदर्शन श्री मिलिंद सुरवाडे यांनी केले. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त ठरलेली ही परिषद यशस्वीरित्या पार पडली.




















