जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२६
अनेकानेक फेरीवाले,पथविक्रेते रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला,फळे विकून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत.मात्र त्यांच्यावर अतिक्रमण विभाग व प्रशासनाच्या माध्यमातुन नित्य कारवाई करून त्यांच्या मालाची नासधूस केली जाते.त्यामुळे त्यांचे जगणे मेटाकुटीला आलेले आहे. अशाच नेहमीच्या त्रासाला कंटाळून बदलापूर येथील विशाल दाते नामक २८ वर्षीय तरुणाला ट्रेनखाली झोकून देत आत्महत्या करावी लागली आहे.उर्वरित महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे.खरे तर पथविक्रेते अधिनियम २०१४ नुसार अशी कारवाई करणे वा त्यांना सन्मानजनक उपजीविका भागविण्यापासून रोखणे हे पूर्णतः गैर आहे.किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अनुच्छेद १९ (१) (ग) अंतर्गत व्यवसायाचा अधिकार मान्य केला आहे.मुंबई उच्च न्यायालयानेही राज्य शासन ,स्थानिक स्वराज्य संस्थाना पथ विक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची TVC ची स्थापना ,सर्वेक्षण आणि योजना अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत.असे असतांना या सर्व गोष्टीची पूर्तता न करता उपरोक्त व्यावसायिकांना त्यांच्या सन्मानजनक रोजगारापासून वंचित केले जात आहे..हे महाराष्ट्रभर सर्रास घडत आहे. या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन घोषित केले आहे.त्याचा पहिला टप्पा आज १२ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्याचा होता..

या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष सुनिल देहडे व जळगाव जिल्हा सचिव खुशाल सोनवणे यांनी केले.
१)विशाल दाते या तरुणास आत्महत्या करण्यास भाग पडणाऱ्या अतिक्रमण अधिकारी,मुख्य अधिकारी तसेच भाजपा नगरसेवक संभाजी शिंदे व नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
२)त्याच्या कुटुंबीयास आर्थिक मदतीबरोबरच एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे.
३)अधिनियम २०१४ व महाराष्ट्र नियम २०१६ ची राज्यभर अमलबजावणी केली जावी.
४)ज्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झाले नसेल त्यांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांना त्यांच्या व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करावे.त्यांच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण करून सन्मानजनक उपजीविका भागविण्याच्या हक्काचे रक्षण करावे इत्यादी मागण्या या निवेदनात नमूद केल्या आहेत.
निवासी उपजिल्हाधिका-यांना दिले निवेदन…
सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मा.चव्हाण मॅडम यांना बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रुषी भारसके व शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिले. बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष देवानंद निकम, पथविक्रेत्यांचे कायदेशीर सल्लागार एड.आनंद कोचुरे पथविक्रेता प्रमुख विनोद निकम ,मल्हारी सरदार,रमेश थाटे,दिनकर भालेराव,मधुकर अहिरे,त्र्यंबक सोनवणे,अमजद रंगरेज, आनंदराव निकम,कॉम्रेड सुधाकर ,तबन ह्याळिंगे, रवींद्र बाविस्कर, डॉ.शाकीर शेख,महेंद्र केदारे, कैलास म्हसाने, शालिग्राम सोनवणे,लंकापती भालेराव,महेंद्र साळवे, प्रभाकर मोरे, अंभोरे आदि बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व पथविक्रेते उपस्थित होते.
३१ मार्चला राज्यस्तरीय धरणे आंदोलन….
आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले….. पथविक्रेत्यांच्या न्याय मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास संपुर्ण दुस-या चरणात महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन केले जाईल….. यापुढील आंदोलन हे मंत्रालयावर लाखो पथविक्रेत्यांचा विशाल महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी सुमित्र अहिरे यांनी दिला.





















