
जळगाव मिरर । ६ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हाणामारी व खुनाच्या घटना घडत असताना नुकतेच भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात रविवारी दि. ५ ऑक्टोबर रात्री सुमारास १० ते ११ वाजेच्या दरम्यान किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना समोर येताच जिल्हाभरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जितेंद्र कोळी (वय ४०) हा जळगाव शहरातील तीन परिचित व्यक्तींसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका वैयक्तिक कामानिमित्त गेला होता. रात्री उशिरा चौघेही एका हॉटेलवर बसून मद्यपान करत असताना त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद काही क्षणांतच चकमकीत परिवर्तित झाला आणि आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली.
घटनेची माहिती मिळताच मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांनी मा. श्री राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांना आदेश दिले की खुनातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन प्रकरण उघडकीस आणावे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात PSI गोरे, पोकॉ सिद्धेश डापकर, रतन गीते, सलीम तडवी, मयूर निकम, किशोर पाटील, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल नरवाडे, आणि शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी योगेश साबळे यांचा समावेश होता. या पथकाने रात्रभर प्रयत्न करून गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
या संशयित आरोपी राजू सपकाळे (वय ३८) मयूर अलोने (वय ३२) या दोन्ही संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. दरम्यान, भुसावळ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी स्वतंत्र पथक तयार करून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू ठेवला. या कारवाईत भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली.
भुसावळ शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमागील नेमकं कारण आणि इतर कोणतेही सहकारी असल्यास त्यांचा शोध सुरू आहे.




















