जळगाव मिरर | १४ नोव्हेंबर २०२५
अंगावर गरम पाणी पडल्यामुळे गंभीररित्या भाजल्या गेलेल्या चेतन जितेंद्र पाटील (वय ४, रा. वाटीका आश्रम) या चिमुकल्याचा उपचार सुरु असतांना दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाटीका आश्रम परिसरात जितेंद्र पाटील हे वास्तव्यास असून ते एसटी वर्कशॉपमध्ये नोकरीस आहे. आठ दिवसांपुर्वी त्यांचा चार वर्षांचा मुलगा चेतन हा घरात खेळत होता. खेळत असतांना त्याने आईकडे पोहे खाण्यासाठी हट्ट धरला. त्याची आई पोहे तयार करण्यासाठी कांदे कापत असताना, चेतन खेळत असताना अचानक बाथरुममध्ये गेला तेथे बादलीत ठेवलेले गरम पाणी चुकून त्याच्या अंगावर पडले. गरम पाण्यामुळे चेतन गंभीररित्या भाजला गेला होता. त्याला तातडीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
भाजलेल्या जखमांमुळे त्याची प्रकृती गंभीर बनली होती. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे वाटीका आश्रम परिसरात तसेच पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



















