जळगाव मिरर | १८ नोव्हेंबर २०२५
गेल्या दोन महिन्यांपासून महावितरण विभागाकडून मीटर रिडिंग घेण्याच्या तारखेत अचानक बदल करण्यात आल्यामुळे जळगाव शहरातील नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी दर महिन्याच्या २५ तारखेला घेतले जाणारे रिडिंग आता २२ तारखेलाच घेतले जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या बदलामुळे हजारो ग्राहकांचे बिल अनाठायी वाढून येत असून विशेषतः ऑनलाईन रीडिंग सबमिट करणाऱ्या ५०% पेक्षा जास्त ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
या तक्रारींचा गांभीर्याने मागोवा घेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहर तर्फे आज महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन देण्यात आले. बदललेल्या रिडिंग तारखेचा ग्राहकांवर होणारा थेट आर्थिक परिणाम, चुकीच्या रिडिंगमुळे आकारण्यात येणारे दंड व विलंब शुल्क, तसेच तक्रार निवारणासाठी नागरिकांना करावा लागणारा त्रास या सर्व मुद्द्यांची निवेदनात सविस्तर मांडणी करण्यात आली.
मनसेच्या निवेदनानंतर महावितरणने तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही, तातडीने ग्राहकांना एसएमएस, अधिकृत संकेतस्थळ व मराठी भाषेतील सूचनांद्वारे नेमकी माहिती देण्यात यावी, चुकीच्या बिलांतील सर्व दंड माफ करण्यात यावेत व पुढील काळात रिडिंगच्या तारखेत बदल करण्यापूर्वी किमान १५ दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे, असा मनसेचा ठाम आग्रह आहे.
मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, ग्राहकहिताच्या या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्वरित व सकारात्मक दखल घेतली नाही, तर पक्षाला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, याची नोंद घ्यावी.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, विकास पाथरे, ॲड. सागर शिंपी, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















