
शिरपूर, धुळे येथे ऐतिहासिक राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६
शिरपूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, किसान विद्या प्रसारक संस्था (केव्हीपीएस) व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य बॉक्सिंग पंच व तांत्रिक अधिकारी परीक्षा तसेच नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धा – २०२६ शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासो. विश्वासराव रंधे क्रीडा संकुल, शिरपूर येथे अतिशय दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच शिरपूर या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एवढ्या भव्य स्वरूपात राज्य पंच व तांत्रिक अधिकारी परीक्षा आयोजित करण्यात आल्याने हा उपक्रम ऐतिहासिक ठरला. नंदुरबार, धुळे, नाशिक शहर, नाशिक जिल्हा, जळगाव, पुणे शहर, पुणे जिल्हा, बुलढाणा, सोलापूर, अहिल्यानगर, कोल्हापूर, मुंबई, बीड, पिंपरी-चिंचवड तसेच ठाणे जिल्हा अशा एकूण १५ जिल्ह्यांतील पंच परीक्षार्थी सहभागी झाले. परीक्षेत ६० पंच (Referee & Judges) व १० तांत्रिक अधिकारी (State Technical Officials) असे एकूण ७० पंच परीक्षार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहिले.
राज्य पंच परीक्षेच्या निमित्ताने भारतीय बॉक्सिंग महासंघाचे माजी महासचिव, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे तीन वेळा निर्विवाद अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे मा.उपाध्यक्ष, ऑलिम्पिक रेफ्री माननीय जय कवळी यांनी या अभूतपूर्व उपक्रमाला भेट दिली. दादासो विश्वासराव रंधे क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग व अत्याधुनिक क्रीडा साहित्य पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि म्हणाले, “काल, आज आणि उद्याचे भविष्य येथे आज सत्यात उतरलेले दिसत आहे.” तसेच नवोदित पंचांना त्यांनी नियमांचे सखोल ज्ञान, निर्णयातील निष्पक्षता, रिंगमधील शिस्त व आंतरराष्ट्रीय मानकांबाबत बारकाईने मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात राज्य पंच परीक्षा होत असल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
राज्य पंचांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी सांगितले की, दिवसेंदिवस बॉक्सिंग खेळाडूंची संख्या वाढत आहे. केव्हीपीएस स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॉक्सिंग खेळाडूंसाठी लवकरच स्वतंत्र आधुनिक बॉक्सिंग हॉल उभारण्यात येणार आहे. ही बाब खेळाडू व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेसाठी अत्यंत आनंदाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंच परीक्षेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार व्हावळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहाय्यक मार्गदर्शक म्हणून कॅप्टन सुरेश कदम (चेअरमन, RJCCP – आंतरराष्ट्रीय पंच), श्री. विजय गोटे (सचिव, RJCCP – आंतरराष्ट्रीय पंच) व श्री. अभिमान सुर्यवंशी (सचिव, रेफरी जज कमिशन – राष्ट्रीय पंच) यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन परीक्षार्थींना मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षा उच्च दर्जात व पारदर्शक पद्धतीने पार पडली.
या उपक्रमांतर्गत STOCCP (State Technical Official Certificate Course Program) तसेच RJCCP – STAR 1, STAR 2, STAR 3 (Referee & Judges Certificate Course Program) यशस्वीरीत्या पूर्ण झाले. सक्षम व गुणवत्तापूर्ण पंच घडविण्याच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वपूर्ण टप्पा ठरली.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेला गौरवशाली इतिहास लाभलेला असून राज्यातून सात वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारे पंच घडले आहेत. आज पर्यंत महाराष्ट्राचे के पी कुका, असती अडाजानिया, किशन नरसी, जय कवळी आणि गेव नागपूरवाला हे पाच जण ऑलिंपिक मध्ये रेफ्री म्हणून सहभागी झाले आहेत.
नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत विविध वयोगटातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी सादर केली. बक्षीस वितरण समारंभात विविध मान्यवरांनी प्रायोजकत्वाद्वारे मोलाचे सहकार्य केले. सर्व सुवर्णपदक विजेत्यांसाठी स्पेशल ऑलिंपिक भारत – महाराष्ट्र एरिया डायरेक्टर डॉ. भगवान तलवारे यांनी बॅग, सर्व रौप्यपदक विजेत्यांसाठी मिथिलेश रोकडे यांनी स्किपिंग रोप, रवी प्रतापसिंग (संचालक, आयआयटी फाऊंडेशन) यांनी सर्व खेळाडूंसाठी मेडल्स, प्रा. भरत कोळी यांनी ट्रॉफीज, तर राहुल चौधरी (संचालक, कृपाल फ्रुट्स) यांनी सर्व खेळाडूंना केळी वाटप केले. या सर्व प्रायोजकांसह नंदुरबार जिल्हा बॉक्सिंग संघटना यांचे विशेष सहकार्य लाभले.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, कार्याध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार, उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष मिलिंद साळुंखे, उपाध्यक्ष विजय सोनवणे, महासचिव भरतकुमार व्हावळ तसेच खजिनदार मनोज पिंगळे यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत महाराष्ट्रातील बॉक्सिंग चळवळीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयूर ठाकरे यांनी केले. आभार प्रदर्शन धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे यांनी व्यक्त केले.
या भव्य आयोजनासाठी विजेंद्र जाधव, सागर कोळी, ऋषिकेश अहिरे, नुर तेली, हेमंत शिरसाठ, भूषण पवार, राज पाटील, ओम राजपूत, गोविंद बर्डे व नैतिक माळी यांनी अथक परिश्रम घेतले.
ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह पार पडलेली ही राज्य पंच परीक्षा व विभागीय स्पर्धा महाराष्ट्रातील बॉक्सिंग चळवळीला नवी दिशा देणारी आणि भविष्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे.





















