
विवेकसिंधू साहित्य संमेलनात डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२६
भाषा केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित न ठेवता नियमित वाचन, लेखन व संभाषणातून ती अधिक समृद्ध होते. दररोज वाचण्याची सवय लावल्यास शब्दसंपदा वाढते, विचारांची व्याप्ती विस्तारते आणि अभिव्यक्ती अधिक प्रभावी होते. यासाठी मराठी वाचनाची सवय लावावी, शुद्धलेखनाचा सराव करावा व दैनंदिन जीवनात शक्य तितक्या प्रमाणात मराठीत संवाद साधावा. प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा. मराठीच्या बळावरच इतर भाषांचे ज्ञान संपादन करणे आपल्याला सोपे होते. मातृभाषा मराठीची ताकद ओळखून तिला समृद्ध केल्यास आपल्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला होतो, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय, सावखेडा, जळगाव येथे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विवेकसिंधू साहित्य संमेलन पार पडले. प्रमुख वक्ते डॉ. जगदीश पाटील यांनी मराठी भाषेची महती सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रारंभी दीपप्रज्वलन करून सरस्वती माता, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व शास्त्रज्ञ सी. व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकांवर आधारित हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. अतिथींचा परिचय प्रियंका कोळी यांनी करून दिला. संस्थेचे सचिव विनोद पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, सेवानिवृत्त शिक्षक आर. ए. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी लाभले आम्हास हे गीत सादर केले. पक्षीमित्र उमेश इंगळे यांच्या संकल्पनेतून क्यूआर कोडसह शालेय परिसरात उभारण्यात आलेल्या पक्षी मार्गदर्शक फलकांचेही अनावरण यावेळी करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. सूत्रसंचालन सार्थक बामेरे, शांभवी जोगळेकर, प्रसाद कुलकर्णी, किशोरी हिरे, ज्ञानेश्वरी महाजन, किशोरी पाटील या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले. आभारप्रदर्शन प्रवीण पाटील यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी बालभारती काव्यांगण, बालभारती चित्रांगण, काव्यवाचन : स्वरचित कविता, कथाकथन : बोलीभाषा, सुलेखन : देवनागरी लिपी, रॅप साँग स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. परीक्षक म्हणून अनुराधा धायबर, वर्षा अहिरराव, सचिन पाटील, कविता कुरकुरे, सूर्यकांत पाटील, सुजाता ठाकरे यांनी काम पाहिले. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान मॉडेल्सच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यात साठ मॉडेल्ससह दीडशे विद्यार्थी सहभाग झाले. सोलर कार, एअर प्युरिफायर, स्मार्ट सिटी, हायड्रोइलेक्ट्रिक लिफ्ट आदी अभिनव प्रकल्प साकारले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचे आणि सृजनशीलतेचे विशेष कौतुक केले. परीक्षक म्हणून रवींद्रसिंह पाटील यांनी काम पाहिले. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
विवेकसिंधू साहित्य संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जगदीश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मातृभाषेचा सन्मान राखत तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. घरात, शाळेत आणि समाजात मराठीचा आत्मविश्वासाने वापर केल्यास तिची ताकद अधिक वाढते. मराठी भाषा समृद्ध झाली तर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडतो आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया अधिक मजबूत होतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.




















