
जळगाव मिरर | ३ मार्च २०२६
धुळवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्यासारखी कार्यपद्धती अवलंबल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी खामेनींविरुद्ध जशी कठोर भूमिका घेतली, त्याप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या राजकारणाला धक्का दिला, अशी टीकाही त्यांनी केली.
धुळवड साजरी करताना सदावर्ते यांनी कुटुंबीय व समर्थकांसह रंगोत्सवात सहभाग घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
सदावर्ते म्हणाले की, धुळवड हा सण आनंद, मनोमिलन आणि सकारात्मकतेचा आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सणांचा उत्साह द्विगुणित झाला आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी हिंदीतून कविता सादर करत राजकीय टोलेबाजी केली –
“होली आई रंगो वाली, बदल गई फिर चाल निराली,
राज ठाकरे रंग बदलें, उद्धव संग मंच पे चढ़ लें,
शरद पवार मुस्कान छुपाएं, पुरानी चाल फिर दोहराएं,
एकनाथ शिंदे भी आए, कल की बातें भूल ही जाएं,
बुरा न मानो होली है…”
इराणमधील परिस्थितीचा संदर्भ देत सदावर्ते यांनी अयातुल्लाह खामेनी यांच्यावर टीका केली. इराणमध्ये महिलांवर अन्याय होत होता, हिजाब बंधनकारक करण्यात आला होता, असे सांगत त्यांनी खामेनींना “मानवतेच्या विरोधातील नेता” असे संबोधले. त्यांच्या मृत्यूमुळे इराणी महिलांना दिलासा मिळाला, असा दावा त्यांनी केला. “हे युद्ध नसून मानवाधिकारांची लढाई आहे. महिलांवरील अन्यायाविरोधातील संघर्ष आहे. कोणत्याही प्रकारचा हुकूमशहा मान्य होणार नाही,” असे ते म्हणाले. धुळवडीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदावर्ते यांच्या टीकेवर संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




















