
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके : आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते विविध सुविधांचे विमोचन
जळगाव मिरर | ४ मार्च २०२६
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, हाच आपला ठाम संकल्प असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. बोऱमळी येथे आयोजित आदिवासी बांधवांच्या पारंपरिक होळी उत्सवात मंत्री श्री वुईके, सहभागी झाले होते.त्यानंतर वर्डी (ता. चोपडा) येथे आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित आदिवासी जनकल्याण विकास परिषदेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास, वर्डी गावाचे सरपंच शोभा पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, उपयुक्त निलेश अहिरे, प्रांताधिकारी मयूर भंगाळे,यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तालुक्यातील लोकप्रतिनिधी व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ.वुईके म्हणाले, शासकीय आश्रमशाळांमध्ये सुमारे पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. पात्रताधारक नसलेल्या व्यक्तींमार्फत शिक्षण दिले जाणे योग्य नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण व पात्र शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेत १,७७१ शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. आंदोलन, विरोध किंवा अपप्रचार यांना न जुमानता विद्यार्थ्यांच्या हितालाच प्राधान्य देण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नामांकित व अनुदानित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना भेदभाव होऊ नये, याबाबत शासन गंभीर आहे. ज्या शाळा विद्यार्थ्यांशी प्रामाणिकपणे वागतील त्या सुरू राहतील; मात्र विद्यार्थ्यांच्या सन्मानाशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. महिला सक्षमीकरणावर भर देताना मंत्री डॉ. वुईके यांनी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण व सक्षमकरण योजना’ सुरू केल्याची माहिती दिली. आदिवासी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारून इतरांना रोजगार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिला बचत गटांनी सूक्ष्म व लघुउद्योग उभारावेत, अध्यक्ष व सचिवांनी जबाबदारी स्वीकारून स्वावलंबनाचा मार्ग निवडावा, असे त्यांनी सांगितले. घरकुल योजना व महिला बचत गटांची प्रभावी अंमलबजावणी ही गावाच्या प्रगतीची खरी ओळख असल्याचे नमूद करत, प्रकल्प अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. आदिवासी संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री डॉ. वुईके यांनी नुकत्याच झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील दौऱ्याचा उल्लेख केला. तेथे पारंपरिक ‘भोंगरा बाजार’ व काठी होळी उत्सवात सहभागी होत आदिवासी परंपरा, वेशभूषा व संस्कृतीचा अनुभव घेतल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाची गौरवशाली परंपरा जिवंत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आदिवासी बांधवांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
परिषदेत मंत्री डॉ वुईके यांनी आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा व विकास विषयक मुद्द्यांवर चर्चा केली.
कार्यक्रमात डॉ. वुईके यांच्या हस्ते,राज्य शासनामार्फत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी तयार केलेल्या व्हाट्सअप चार्ट बोर्ड, माहितीपट तसेच शासकीय योजनांची माहिती असलेल्या यशोगाथा या डिजिटल पुस्तकाचं अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, रोजगार यांसारख्या विषयांवर शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली.
प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी श्री पवार यांनी, सांगितले शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती आदिवासी घटकांपर्यंत पोहोचविने हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे यावेळी त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाला तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















