
जळगाव मिरर | ७ मार्च २०२६
सध्या लग्नसराईला काही महिने शिल्लक आहेत आणि एप्रिल–मे महिन्याचा हंगाम सुरू होणार आहे. या हंगामात सर्वप्रथम खरेदी केली जाते ती म्हणजे दागिने. मागील काही महिन्यांत दागिन्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, मात्र आता चांदीच्या किमतीत मोठे बदल झाले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.
विशेष म्हणजे फक्त तीन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल 30,000 रुपयांची घट झाली आहे. सध्या देशातील सराफा बाजारात चांदीची किंमत 285 रुपये प्रति ग्रॅम किंवा 2,85,000 रुपये प्रति किलो इतकी आहे. मागील दिवसांच्या तुलनेत किंमतीत लहान प्रमाणात चढ-उतार दिसत आहेत.
चांदीच्या किमतींवर अनेक घटक परिणाम करतात. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकन डॉलरची स्थिती, महागाईबाबतच्या अपेक्षा आणि जिओपॉलिटिकल तणाव यांचा समावेश आहे. मिडल ईस्टमधील तणाव आणि डॉलरमधल्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने-चांदीकडे वळत आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्येही सोन्या-चांदीच्या फ्युचर्समध्ये हालचाल दिसून आली आहे. एप्रिल गोल्ड फ्युचर्समध्ये वाढ नोंदवली गेली असून, मे महिन्याच्या चांदीच्या फ्युचर्समध्येही काही प्रमाणात तेजी दिसत आहे.
सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे या काळात चांदीच्या किमतीत वाढ किंवा घट होणार का, याकडे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांचे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत जागतिक बाजारातील संकेतांनुसार चांदीच्या किमतीत आणखी चढ-उतार दिसू शकतात, तरीही सोने आणि चांदी हे भारतीयांसाठी दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानले जात आहेत.




















