
लहानपणाची श्रद्धा एकोप्याच्या भावनेने मनात रुजली भावना
जळगाव मिरर | १९ मार्च २०२६
रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम समाजातील लहान-थोर कडक पद्धतीत रोजे ठेवतात,आपण हे ऐकत व पाहत आलो आहोत. परंतु, परीट-धोबी असलेले हिंदू धर्मीय विवेक ठाकरे हे गेली २७ वर्षांपासून व त्यांच्या पत्नी मनीषा ठाकरे १३ वर्षांपासून दरसाल नित्यनियमाने रोजे करतात. आपल्या मूळ गावी दरवर्षी इफ्तार पार्टीसुद्धा आयोजित करतात.
मूळ रावेर तालुक्यातील निंभोरा येथील विवेक ठाकरे व मनीषा ठाकरे हे जळगाव शहरात दोघेही प्रकाशन,राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
आपल्या मूळ गावी ज्या वाड्यात विवेक ठाकरे राहत होते तेथे मुस्लीम धर्मीय मौले पटेल आणि खाटीक हे त्यांचे शेजारी असल्याने त्यांच्या एकमेकांच्या घरात हिंदू-मुस्लीम सर्व सण साजरे होत होते.रमजान महिना,रोजा,ईद, मोहरम ताजिया व नमाज-अजान आदी शब्द नित्य कानावर पडत होते.त्यामुळे या शेजाऱ्यांच्या सहवासातून ठाकरे यांचे काका, त्यानंतर आईने रमजान महिन्यात दोन महत्त्वाचे रोजे ठेवण्यास सुरुवात केली. आपले शेजारचे धोबी कुटुंबीय रोजा करतो म्हटल्यावर मौले-पटेल आणि खाटिक यांनीही श्रावण महिन्यातील सोमवारचे उपवास,आषाढी – कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री हे उपवास करण्यास सुरुवात केली. शेजारी राहणाऱ्या रुक्साना पटेल या सारे सण आणि हिंदू धर्माचे व्रत -वैकल्य करत यामुळे सामाजिक एकता व परस्पर बंधुभाव वाढीस लागला. त्यामुळे वाड्यातील अनेक हिंदू मुलांनाही मुस्लीम धर्मातील प्रार्थना तोंडपाठ व्हायला लागल्या. पुढे हे दोन्ही एकमेकांच्या धर्मातील सर्व सण ज्यांच्या त्यांच्या प्रथेप्रमाणे आणि प्रार्थना म्हणत साजरे करण्यास सुरू झाले. दोन्ही धर्मीय शुद्ध अंतःकरणाने एकमेकांच्या प्रथेचा आदर करीत असल्याने धर्माच्या नावाच्या भिंती लहानपणीच नाहीशा झाल्या.
सहेरीवेळी नियत,तर इफ्तारवेळी पसायदान :
विवेक ठाकरे यांच्या रोजाच्या व्रताला तब्बल २७ वर्ष पूर्ण होत असतांना त्यांच्या पत्नी या आपल्या सासू वैकुंठवासी झाल्यावर त्यांचा प्रण पुढे नेत गेल्या १३ वर्षापासून रोजा करीत आहेत.ठाकरे पती-पती आपल्या मुलांसह सहेरीवेळी पहाटे ‘व बि सोमिगदिन नवई तु मिन शहरी रमजान’ अशी नियत तर इफ्तारवेळी संत ज्ञानेश्वरांचे आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यों तोषावें । तोषोनि मज द्यावें। ही पसायदान प्रार्थना म्हणत रोजा (उपवास) सोडतात. त्यामुळे दोन्ही धर्मातील प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचविल्या जातात.या धार्मिक एकोपा वाढवणाऱ्या परंपरेमुळे या दाम्पत्याचे कौतुक होत आहे.




















