
बोगद्याच्या अभावाचा पुन्हा बळी; संतप्त नागरिकांचा प्रशासनावर सवाल
जळगाव मिरर | २३ मार्च २०२६
राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका (कासोदा फाटा) येथे रविवारी (दि. २२) दुपारी सुमारे १ वाजता झालेल्या भीषण अपघातात एरंडोल येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा आरटीओ एजंट मंगेश शिवदास पाटील (वय ६६, रा. पाटीलवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पाटील हे रविवारी दुपारी आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ डीएक्स १०९४) शेताकडे जात होते. अमळनेर नाका परिसरातील कासोदा फाटा क्रॉसिंग ओलांडत असताना जळगावकडून धुळेच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने (क्र. डीडी ०१ एस ९१०३) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी होती की पाटील रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मात्र, माणुसकीला काळिमा फासत संबंधित कंटेनर चालक वाहन सोडून पळून गेला. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत काही वेळातच चालकाला ताब्यात घेतले.
मंगेश पाटील हे एरंडोलमधील एक सन्माननीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच पाटीलवाडा परिसरासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
दरम्यान, कासोदा फाटा येथे बोगद्याच्या अभावामुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने आज पुन्हा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “या मृत्यूस जबाबदार कोण?” असा तीव्र सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून कंटेनर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय पाटील करीत आहेत.




















