
जळगाव मिरर | २५ मार्च २०२६
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक कामगार नेते आणि कुशल संघटक गजानन राणे यांची जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी पुनश्च नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे गजानन राणे आता जळगाव जिल्ह्याच्या पक्षविस्ताराची धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
गजानन राणे यांनी यापूर्वी २०१३ मध्ये देखील जळगाव जिल्ह्याचे संपर्क अध्यक्षपद अत्यंत समर्थपणे भूषवले होते. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, राजकीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जुने ऋणानुबंध पाहता, राज ठाकरेंनी त्यांच्या अनुभवावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. जुन्या जाणत्यांना सोबत घेऊन आणि नव्या रक्ताला उभारी देण्यात राणेंचा हातखंडा मानला जातो.
कामगारांच्या हक्कासाठी आक्रमकपणे लढणारे नेतृत्व म्हणून गजानन राणे यांची ओळख आहे. मोठ्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी दिलेले लढे सर्वश्रुत आहेत. प्रशासकीय आणि व्यावसायिक पातळीवर सामान्यांचे प्रश्न सोडवताना त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
स्पष्टवक्तेपणा आणि संघटन कौशल्य
स्पष्ट आणि परखड विचार, माणसं जोडण्याची विलक्षण कला आणि धडाकेबाज कार्यशैली हे राणेंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत. जळगाव जिल्ह्याला सध्या अशाच एका खंबीर आणि अनुभवी नेतृत्वाची गरज होती, जी या निवडीमुळे पूर्ण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे. गजानन राणे या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात मनसेचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
गजानन राणेंची ही निवड सार्थ असून, जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक संघटनाला यामुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा जळगाव मनसेला निश्चितच होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.




















