
जळगाव मिरर | २९ मार्च २०२६
राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता अमरावती जिल्ह्यातुन एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भानखेडा रोडवरील जंगल परिसरात एका 18 वर्षीय तरुणीवर पाच नराधमांच्या टोळीने सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीने जात असताना या टोळीने त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, या नराधमांनी पीडितेच्या मित्राकडील 120 रुपयेही जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि त्यानंतर तरुणीवर बळजबरीने अत्याचार केला.
या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तत्परता दाखवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचही संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे अमरावती परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अत्याचाराच्या या घटनेनंतर पीडित तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित गुन्हा दाखल केला आणि विशेष शोधमोहीम राबवून पाचही संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि दोषींना कठोर शासन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






















