
जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६
पारोळा तालुक्यातील आंबापिंप्री येथे शेतशिवारात विषबाधेमुळे मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत ८५ मेंढ्या आणि १ शेळी मृत्युमुखी पडली असून १९२ मेंढ्यांना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना १ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र विनायक पाटील यांच्या शेताजवळ समाधान मरू खताळ, बाबूलाल अण्णा धनगर, भटू तानु वटगर आणि पावबा उदा कोळपे या धनगर-ठेलारी समाजातील चार मेंढपाळांच्या सुमारे ८०० शेळ्या-मेंढ्यांचा मुक्काम होता. यावेळी शेजारील शेतातील अवकाळी पावसामुळे ओले झालेले गव्हाचे पीक आणि पाण्यात सडलेले टोमॅटो मेंढ्यांनी खाल्ले.
यानंतर काही वेळातच मेंढ्यांना त्रास जाणवू लागला आणि मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत २७८ मेंढ्यांना विषबाधा झाली होती. त्यापैकी १९२ मेंढ्यांवर तातडीने उपचार करून त्यांना वाचविण्यात यश आले, तर ८५ मेंढ्या आणि १ शेळीचा मृत्यू झाला.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत, पाण्याने भिजलेल्या गव्हाचे पीक आणि सडलेल्या टोमॅटोमुळे ‘अॅसिडोसिस’ या आजाराचा प्रादुर्भाव होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील मनोजकुमार रतन वानखेडे यांनी तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवले. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने उपचार सुरू केले. डॉ. भरतकुमार देसले, डॉ. भाग्यश्री केंद्रे, डॉ. करिश्मा तडवी यांच्यासह पथकाने बाधित पशुधनावर उपचार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रसंगी सरपंच मनोहर बाबूलाल माळी, तलाठी रामराव लालू राठोड, कोतवाल महेंद्र पवार तसेच इतर स्थानिकांनी मदतकार्य केले. या घटनेमुळे संबंधित मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे.





















