
जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२६
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. आजही अनेक भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा प्रभाव कायम असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यात अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांत पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील हाताशी आलेली पिके वाया जात असून शेतकरी हतबल झाले आहेत. अनेक ठिकाणी पिके आडवी पडली असून काढणीस तयार असलेले उत्पादन खराब झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड शहरासह अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यांत पावसामुळे परिस्थिती बिकट झाली असून शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. टोकावडे, मोरोशी, शिरोशी आणि धसई परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा, चिकू आणि इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. झाडांवरील फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विजेच्या कडकडाटामुळे गंभीर घटना घडली. अहिल्यापूर शिवारात झाडाखाली उभ्या असलेल्या दोन बैलांवर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकूणच राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





















