
जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२६
मुंबईतील एका प्रौढ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावून तब्बल ६५ लाख रुपये उकळल्याच्या गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात मुंबई सायबर क्राईम शाखेने मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील चौघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीचे वाढते जाळे पुन्हा एकदा समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव यांच्या पथकाने नशिराबाद येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयेश काळे (वय २६, रा. तरसोद, जि. जळगाव) याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार संकेत सोपान महाजन (वय २८) व यशवंत शालिक धांडे (वय २९), दोघेही रा. मेहरुण, जळगाव, यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. तसेच या रॅकेटमधील आणखी एक आरोपी विनोद प्रकाश अत्तरदे (वय ३८, रा. खेडी, जळगाव) यालाही अटक करण्यात आली.
तपासात समोर आले की, आरोपींनी मुख्य सूत्रधाराच्या सांगण्यावरून मुंबईतील फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन सुमारे २५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले होते. ही रक्कम जळगाव येथे आणून पुढील व्यवहारासाठी वापरण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली असून, मुख्य आरोपी जयेश काळे याच्याकडून दीड लाख रुपये रोख व अंदाजे पाच तोळे सोनेही जप्त करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम इतर मार्गाने विल्हेवाट लावल्याचेही उघड झाले आहे.
प्राथमिक तपासात जयेश काळे हा यापूर्वी कंबोडिया येथे नोकरी करत असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीशीही संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपींनी ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून संबंधित महिलेला घाबरवून मोठी रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईतील सायबर पोलीस ठाणे (पश्चिम विभाग, बांद्रा) येथे नेण्यात आले असून अधिक तपास पूनम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची साखळी, संपर्क व डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.
दरम्यान, ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या सायबर फसवणुकीच्या घटना आता ग्रामीण भागातही पोहोचत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. खानदेशातील जळगावपर्यंत या गुन्ह्याचे जाळे पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी अनोळखी कॉल, धमक्या किंवा ऑनलाईन व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.





















