
जळगाव मिरर | १८ मे २०२६
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली असून विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच रंगणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या 17 विधान परिषद जागांसाठी अखेर अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी येत्या 18 जून 2026 रोजी मतदान होणार असून 22 जून 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या जागा दीर्घकाळ रिक्त राहिल्यामुळे राजकीय पक्षांकडून सातत्याने निवडणुका घेण्याची मागणी केली जात होती. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, संबंधित मतदारसंघातील किमान 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे तसेच किमान 75 टक्के लोकप्रतिनिधी पदावर असणे आवश्यक असते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ही अट पूर्ण न झाल्याने निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या.
आता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व आवश्यक निकष पूर्ण झाल्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर आयोगाने तत्काळ निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
जळगाव विधान परिषद मतदारसंघातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विधान परिषदेचे माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत नव्याने निवडून आलेले नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेचे नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष मतदान करणार आहेत. मात्र जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजपाकडून नंदू अडवाणी, नंदू महाजन आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडूनही या जागेवर दावा सांगितला जात असून महायुतीत जागावाटपावरून चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विधान परिषद निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
- अधिकृत अधिसूचना जारी : 25 मे 2026 (सोमवार)
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 1 जून 2026 (सोमवार)
- अर्ज छाननी : 2 जून 2026 (मंगळवार)
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 4 जून 2026 (गुरुवार)
- मतदान : 18 जून 2026 (गुरुवार)
- मतदानाची वेळ : सकाळी 8 ते दुपारी 4
- मतमोजणी व निकाल : 22 जून 2026 (सोमवार)





















