
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला गटविकास अधिकारी रमेश सपकाळे, माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, दिलीप पाटील, प्रभाकर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक आणि पत्रकार उपस्थित होते.
प्रारंभी गटविकास अधिकारी रमेश सपकाळे यांनी बैठकीतील कामांचा आढावा सादर केला. तालुक्यातील 14 गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून संबंधित गावांकडून विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी 9 गावांसाठी तहसीलदार कार्यालयाकडून विहीर अधिग्रहणाचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच निमखेडी खुर्द, मेळसांगवे, पंचाणे, वायला, टाकळी, अंतुरली, चारठाणा, चिखली, कोथळी आणि वडोदा या गावांमध्ये ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याचे समोर आले. काही ग्रामसेवकांकडे चार-चार गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने प्रशासनावर ताण वाढत असल्याची बाबही चर्चेत आली.
बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना आणि शबरी आवास योजना यांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. ग्रामसेवकांनी नागरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेची उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.






















