
जळगाव मिरर | २२ मे २०२६
चोपडा तालुक्यातील गलंगी येथे ट्रकने धडक दिल्याने अनवर्दे बुद्रुक येथील दुचाकीस्वार दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना २१ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत मनीष कोळी व अमित गायकवाड या दोघांचा मृत्यू झाला असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनवर्दे येथील मनीष उर्फ राज रवींद्र कोळी (वय २५) व अमित वासुदेव गायकवाड (वय २०) हे दोघे तरुण दुचाकीने शिरपूरकडे जात होते. तर, गलंगी येथील सुधाकर पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (एमएच – १८, ईजी- ३४३६) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात राज कोळी व अमित गायकवाड यांना गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या दोघांनाही चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केल्याने नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. मयत मनीष व अमित यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दोघेही मयत हे सामान्य कुटुंबातील आहेत. या प्रकरणी डॉ. पवन पाटील यांच्या माहितीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप व ग्रामीण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी भेट दिली. तपास पो.हे.कॉ. हेमंत कोळी करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच चोसाकाचे माजी व्हा. चेअरमन शशिकांत देवरे, अनवर्दे बुद्रुकचे माजी सरपंच गणेश पाटील, अनिल रोहिदास पाटील, सुभाष कोळी, माधवराव पाटील यासह ग्रामस्थांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मयत दोघा तरुणांवर शोकाकुल वातावरणात अनवर्दे बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.





















