
जळगाव मिरर | २८ मे २०२६
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील संवेदनशील भाग असलेल्या रसलपूर येथे गोवंश संदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः रसलपूर गावाला भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या दौऱ्यात पोलीस स्टेशन प्रभारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जामनेर येथे गो-वंशाची अवैध वाहतुक व कत्तलीसाठी नेणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहे. रावेर तालुक्यातील रसलपूर येथे गोवंश वाहतूक किंवा या संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या अवैध कृत्यांवर ‘झिरो टॉलरन्स’ ठेवण्याचे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाला सतर्क राहून कडक सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मध्य प्रदेशातील खरगोन आणि इंदूर भागातून जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यासाठी ‘पाल-एमपी बॉर्डर’ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या बॉर्डरवरील ‘ईद पोलीस चेकपोस्ट’ला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक संशयास्पद वाहनाची कसून तपासणी करण्याचे आदेश चेकपोस्टवरील तैनात कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. गोवंश तस्करीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि सीमाभागातून होणाऱ्या अवैध हालचाली रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आली आहे.





















