
जळगाव मिरर/१० जून २०२६

जळगाव शहरातील विजेच्या विविध गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच महापालिका आणि महावितरण (एमएसईबी) अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याशी संबंधित अनेक समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या तक्रारींचा पाढा वाचत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, राहुल पाटील आणि गजानन मामा देशमुख उपस्थित होते. महावितरणतर्फे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे व सहाय्यक अभियंता निलेश कुरसंगे, तर महापालिकेच्या विद्युत विभागाकडून विभाग प्रमुख मोरे साहेब आणि कनिष्ठ अभियंता सुमित पाटील उपस्थित होते.
बैठकीत शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांना विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय शहरातील स्ट्रीट लाईट व्यवस्थेतील विस्कळीतपणाही चर्चेचा प्रमुख विषय ठरला. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे बंद असतात, तर दिवसा ते सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
शहरातील अनेक भागांत विजेच्या केबल्स धोकादायक पद्धतीने लोमकळत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच अनेक ट्रान्सफॉर्मरच्या पेट्यांवर झाकण नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. या त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
वाहतुकीच्या दृष्टीनेही काही गंभीर बाबी समोर आल्या. अनेक ठिकाणी महावितरणचे वीज खांब रस्त्याच्या मध्यभागी अथवा सर्व्हिस रोडच्या मध्ये असल्याने वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत आहे. संबंधित खांबांचे स्थलांतर करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
निमखेडी सबस्टेशन परिसरातील वारंवारच्या वीज समस्यांवरही बैठकीत विशेष चर्चा झाली. या भागात मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक तक्रारी प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास आले. आवश्यक तेथे अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
तक्रार निवारण व्यवस्थेवरही लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. लाईट गेल्यानंतर नागरिक जेव्हा सबस्टेशनमध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा फोन लागत नाही किंवा कर्मचारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीच्या शेवटी उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महावितरण व महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रलंबित समस्या प्राधान्याने सोडवून आवश्यक दुरुस्तीची कामे तात्काळ सुरू करण्याच्या कडक सूचना दिल्या. शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





















