
जळगाव मिरर | २९ जून २०२६

जून महिन्यात अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असून, २ ते ८ जुलैदरम्यान महाराष्ट्रासह विदर्भात सर्वदूर समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक प्रकाश पारेख यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) देखील राज्यात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे.
प्रकाश पारेख यांच्या मते, यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात तयार होणारी पावसासाठी आवश्यक वातावरणीय प्रणाली निर्माण झाली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून ही परिस्थिती बदलणार असून, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्राकार वारे सक्रिय होतील. त्यातून राज्यभर काळ्या ढगांची निर्मिती होऊन मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल.
याशिवाय, मेडन ज्युलियन ऑसिलेशन (MJO) आणि इंडियन ओशन डायपोल (IOD) या वातावरणीय प्रणालीही जुलैच्या प्रारंभी सक्रिय होणार असल्याने राज्यातील बहुतांश भागात चांगल्या पावसाची शक्यता अधिक बळावली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार सरी कोसळू शकतात. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात १० जुलैनंतर पाऊस काहीसा विश्रांती घेईल, असा अंदाजही पारेख यांनी वर्तविला आहे.
दुसरीकडे, भारतीय हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे २० जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रविवारी रात्री मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. ठाण्यात अवघ्या एका तासात २९ मिमी पावसाची नोंद झाली, तर चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या देशभरात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम महाराष्ट्रातही दिसून येणार असून २८ जून ते ४ जुलैदरम्यान कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















