जळगाव मिरर | १३ जुलै २०२६
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर रविवारी सकाळी दुर्दैवाचा डोंगर कोसळला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत चालत असलेल्या वारकऱ्यांना जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथील मुक्काम आटोपून रविवारी सकाळी जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करत असताना हा भीषण अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांचा ताफा पुढे सरकत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने प्रथम वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर ट्रकने रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की सहा वारकरी गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, इतर वारकरी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. उर्वरित तीन जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे आषाढी वारीच्या आनंदावर विरजण पडले असून, वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना वारकरी आणि भाविकांकडून केली जात आहे.





















