जळगाव मिरर | १५ जुलै २०२६
जळगाव जिल्ह्यातील कॅटरिंग व्यवसायाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता २१ जुलै २०२६ पासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रात्री १ वाजेनंतर कोणत्याही प्रकारची कॅटरिंग सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’च्या वतीने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, यामुळे जिल्ह्यातील हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कामगारांचे आरोग्य आणि वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाऊल
गेल्या काही काळापासून लग्न कार्ये आणि इतर समारंभांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने कॅटरिंग कामगारांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत होता. उशिरापर्यंत काम संपवून अवघ्या काही तासांत, म्हणजेच सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा कामावर हजर व्हावे लागत असल्याने कामगारांची झोप पूर्ण होत नव्हती. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे रात्रीच्या वेळी कामगारांचे अपघात होण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले होते. या गंभीर बाबींची दखल घेत असोसिएशनने हा कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१२ जुलै रोजी येथील ओक मंगल कार्यालयात खानदेश कॅटरिंग असोसिएशनची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कॅटरिंग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या संमतीने हा नवा नियम २१ जुलै २०२६ पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत यांनी दिली. या महत्त्वपूर्ण बैठकीला असोसिएशनचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मार्गदर्शक उपस्थित होते.
यामध्ये जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश टाटिया, जळगाव शहर अध्यक्ष सत्यनारायण जोशी, शहर उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव महेंद्र टाडा, खजिनदार गोपाल व्यास, मुख्य सल्लागार राजेंद्र वैष्णव यांच्यासह रामचंद्र टाडा, मेघराज महाराज, गोवर्धन गुर्जर, दुर्गेश सारस्वत, शिव अग्याल, भवर व्यास, मदन पुरोहित, मदन वैष्णव, बबलु महाराज, मोहन महाराज, शिवा तिवारी, ओम् प्रजापत, केदार शर्मा, गुलाब महाराज आणि जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख कॅटरिंग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या नियमामुळे आता जिल्ह्यातील लग्नकार्ये आणि सोहळ्यांच्या नियोजनातही बदल करावा लागणार असून, कामगारांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.



















