जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२६
नशिराबाद शहरातील मुक्तेश्वर नगर परिसरातील भादली रोडवर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली. दोन तरुण दरोडेखोरांनी घरात अचानक प्रवेश करून सुरी आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवत कुटुंबीयांना धमकावले. दागिने व रोख रक्कम काढून देण्याची मागणी करत घरातील सदस्यांना दहशतीत ठेवण्यात आले. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी घरातील कारची चावी घेतली आणि कारसह घटनास्थळावरून पलायन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तेश्वर नगर परिसरातील भादली रोडवर पोलीस नाईक गणेश साहेबराव कोळी यांचे घर आहे. गणेश कोळी हे विष्णूनगर पोलीस ठाणे, डोंबिवली येथे पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहेत. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गणेश कोळी, त्यांच्या पत्नी सुनीता गणेश कोळी यांच्यासह घरातील अन्य दोन महिला घरात असताना दोन अनोळखी तरुण अचानक घरात घुसले. यावेळी एका दरोडेखोराने सुनीता कोळी यांच्या गळ्याला सुरी लावत दागिने व रोख रक्कम काढून देण्याची धमकी दिली, तर दुसऱ्या दरोडेखोराकडे रिव्हॉल्वर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, गणेश कोळी यांच्या अंगावर सोन्याचे दागिने तसेच हातात सोन्याच्या अंगठ्या असल्याने ते दागिने वाचविण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन लपले. मात्र दरोडेखोरांना याची चाहूल लागताच त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडण्यास सुरुवात केली. परिस्थिती अधिकच गंभीर आणि नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच गणेश कोळी यांनी मदतीसाठी आवाज दिला. याचदरम्यान दरोडेखोरांच्या हाती समोर पडलेली गणेश कोळी यांच्या कारची चावी लागली. त्यांनी घराचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि कार घेऊन भादली रोडच्या दिशेने पोबारा केला. दरोडेखोर पसार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळाली. जवळच राहणारा महेश एकनाथ माळी हा तरुण गणेश कोळी यांच्यासोबत दुचाकीवरून कारचा पाठलाग करण्यासाठी निघाला. मात्र काही अंतर गेल्यानंतर कार नजरेआड झाली.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांना तत्काळ कळविण्यात आले. नशिराबाद पोलिसांसह जळगाव पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवत परिसरात कारचा शोध घेतला. अखेर कार पोलिसांनी ताब्यात घेतली; मात्र सुरी आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दरोडा टाकणारे दोन्ही दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले नसून ते फरार होण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा मुद्दाही पुन्हा अधोरेखित झाला आहे. प्रमुख रस्ते, चौक तसेच संवेदनशील भागांमध्ये सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




















