
रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला एका बहिणीने आपले दोन भाऊ गमावल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये बुधवारी घडली आहे. या घटनेत सख्ख्या मामानेच दोन चिमुकल्या भाच्यांचा घात केल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे की, फतेहपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसारा या गावात राहत असलेले रामकिशोर यांना दोन मुले होती. त्यातील कृष्णा हा सात वर्षाचा होता होता, तर दिव्यांश हा पाच वर्षाचा होता. ते दोघेही एका खाजगी शाळेत शिकत होते.
महेंद्र प्रताप हा रामकिशोर यांची पत्नी कृष्णवतीचा भाऊ असून तो दोन महिन्यांपासून त्यांच्यासोबतच राहायचा. महेंद्र प्रताप हा आपल्या भाच्यांना दररोज मोटरसायलवरून शाळेत सोडायचा. रोजच्या प्रमाणेच घटनेच्या दिवशीही तो भाच्यांना घेऊन शाळेत सोडायला निघाला. परंतु त्यांनतर तो परत आला नाही.
महेंद्र प्रताप याच्या विरोधात रामकिशोर यांनी मुलांचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास केल्यानंतर कालव्यात दोन मुलांचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणाची माहिती कुटुंबाला मिळताच त्यांना जोरदार धक्का बसला आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. ज्या भावाला इतकी वर्षे राखी बांधली तोच भाऊ आपल्या मुलांचा घात करेल असा विचारही त्या आईने कधी केला नसावा. या चिमुकल्यांना एक मोठी बहिणही आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच ही हृदयद्रावक घटना घडल्यामुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.




















