
जळगाव : प्रतिनिधी
स्मार्ट ग्रामपंचायत व १४व्या वित्त आयोगांतर्गत वराड, ता. जळगाव या गावातील विकासकामांसाठी मंजूर झालेल्या २६ लाख ३६ हजार ३०० रुपयांच्या निधीचा सरपंच उखा किसन मोरे व तत्कालीन ग्रामसेवक बबन राजू वाघ यांनी अपहार केल्याचे उघड झाले असून, दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर गुन्हा दाखल होण्यास गती आली आहे .
स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षात रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक आरोग्य, विहीर खोदकाम, नवीन विहीर खोदकाम, घनकचरा, रिचार्ज शॉप, सांडपाणी, अंगणवाडी दुरुस्ती, शाळा दुरुस्ती आदी कामांसाठी हा निधी प्राप्त झाला होता. सरपंच व ग्रामसेवक या दोघांवर प्रत्येकी १३ लाख १८ हजार १५० रुपयांचा अपहार निश्चित करण्यात आला आहे. ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार दोघांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्याला प्रतिसाद न दिल्याने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांविरुध्द फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.




















