
जळगाव : प्रतिनिधी
काश्मीरमधील 370 कलम हटवणे, अयोध्येतील राममंदीर हे बाळासाहेबांचे स्वप्न आज भाजपने पूर्ण केले. तर मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर कोणता गुन्हा केला? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथील जाहिर सभेत बोलताना उपस्थित केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्ताईनगर दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जळगाव जिल्ह्याचा दौरा होता. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मतदार संघात सांगण्यात आले, मोठी पाणीयोजना आणतोय. त्यानंतर पत्रकार परिषदा घेतल्या. असे करत करत चौथी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर टेंडर निघाले. काम सुरु होईपर्यं निवडणुका आल्या. मग योजना थंडबसत्यात गेली. सर्व कामे एकत्रित केली तर लोक निवडून देणार नाहीत. मात्र गुलाबरावांचे असे नाही. त्यांनी 22 हजार पाणी योजना आणण्याचा विक्रम केला.
पुढे शिंदे म्हणाले, आम्ही मतदारांशी खेळखंडोबा करत नाही. लोकांना आपल्याला न्याय द्यायचाय. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहोत. हैदराबाद मी गेलो होतो त्यादिवशी सर्व लोक गोळा झाले. फोटो काढण्यसाठी चढाओढ सुरु होती. आमच्यासोबतचे पोलिस परेशान झाले.
संपूर्ण देशाने, जगाने आम्हा 50 लोकांची दखल घेतली आहे. भाजपचे 106 आणि आम्ही 50 आमची संख्या आज 156 च्या पुढे 170 पर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आता फक्त 30 चा आकडा गाठायचा आहे. 200 क्रॉस झालो तरी नवल वाटायला नको. ग्रामपंचायतींच्या निकालांवरुन हे आपल्याला काल दिसून आले.
एकनाथ शिंदेंनी यावेळी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्हाला बाळासाहेबांचे विचार धाडसाने पुढे न्यायचे आहेत. त्यासाठी हे पाऊल उचलले आहे. बाळासाहेबांची इच्छा काय होती, काश्मिरमधील 370 कलम हटवा. मला एक दिवस पंतप्रधान करा मी हे काम करेल, असे बाळसाहेब म्हणायचे. आणि ती इच्छा मोदी आणि शहांनी पूर्ण केला. राममंदीर व्हावे हे देखील बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्याचे काम सुरु आहे. मग आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर काय गुन्हा केला? बेंबीच्या देठापासून का ओरडताय. तुम्ही असंगाशी संग केला, तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, जनतेने आम्हाला संधी दिली आहे. आपले जे प्रेम मिळत आहे, ते प्रत्येकाच्या नशिबात नसते. त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी तुमच्या समस्या, प्रश्न हे शिवसेना-भाजप युतीचे सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही. ही खात्री मी आज देतो. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.




















