
जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून मागील महिन्यात हवामान आधारित केळी पिक विमा नुकसान भरपाई जवळपास ३७५ कोटींची जाहीर करून वर्ग करण्यात आली होती.
तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे जवळपास अडीच तीन हजार शेतकरी सदर अनुदानापासून वंचित राहिले होते अशा सर्व शेतकऱ्यांसाठी पालकमंत्री यांनी स्वतः प्रशासन तसेच वेळोवेळी, विमा एजन्सी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना वजा आदेश दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील ज्या काही लाभार्थी शेतकऱ्यांना या पिक विम्याचा लाभ मिळाला नव्हता,त्यां शेतकऱ्यांना गेल्या दोन दिवसांपासून आपआपल्या बँक खात्यात विमा रक्कम पडत असल्याने आपल्या घामाचा कष्टाचा पैसा आल्याने सणासुदीला त्यांचा आनंद द्विगुणित झाला असून नुकताच नांदगाव येथील बळीराजा यांनी पालकमंत्री यांनी नामनिर्देशित केलेले आणि सतत पाठपुरावा करणारे तक्रार निवारण समितीचे सदस्य सीए. हितेश आगीवाल यांना सोबत घेऊन कर्तव्यदक्ष लोकनेते पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांचा पाळधी येथे जाऊन स्वयंस्फूर्त गौरव केला व आपल्या लाभार्थी शेतकऱ्यांतर्फे त्यांचे मनापासून आभार मानले.
शेतकरी बांधव सतत कष्ट करून अन्नदाना उपलब्ध करून देत असल्याने आपल्या सर्वांचे उदरभरण होते म्हणून त्यांच्या हितासाठी आपण सदैव सेवेला कार्यतत्पर असून शेतकऱ्यांच्या हितासाठी होईल तितके भले करण्याचे प्रयत्न आपण करू असे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. पालकमंत्री यांच्या स्वयंपूर्ण गौरव प्रसंगी प्रतिष्ठित, अधिकारी ,पंचकोशीतले शेतकरी, सीए.हितेश आगीवाल, चांदसर लोकनियुक्त सरपंच सचिन पवार, जळगाव तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी ,विमा प्रतिनिधी आंदिसह असंख्य नागरिक उपस्थित होते.




















