जळगाव मिरर | ३० जून २०२५
नोकरीचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला नाशिकला घेऊन गेले. त्यानंतर त्या मुलीचे कोल्हापूर येथील मुलासोबत लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूरसह जळगावातील मंडळींकडून वारंवार ठार मारण्याच्या धमक्यांना कंटाळून हरिविठ्ठल नगरातील मुलीच्या पित्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील काही महिलांनी हरिविठ्ठल परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवत तिला जानेवारी महिन्यात नाशिकला घेऊन गेले; परंतु त्या मुलीला नोकरीला न लावता तिला कोल्हापूरच्या काही जणांकडून अडीच लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. या काळात मुलगी ५ महिन्यांची गर्भवती झाली आणि तिचा गर्भपातही झाला. या अमानवीय कृत्याला कंटाळलेल्या मुलीने आपली सुटका करून घेत ती घरी परतली.
रामानंद नगर पोलिसांनी आठ दिवसांपासून तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती.
कोल्हापूर येथून घरी परतलेल्या मुलीने आपल्या कुटुंबीयांना घडलेली आपबिती सांगितली. त्यानंतर लग्न लावलेल्या कोल्हापूर येथील कुटुंबातील काही जणांनी तिला पुन्हा कोल्हापूर येथे पाठवण्यासह पैशांची मागणी ते करू लागले. तसेच मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्याकडून ठार मारण्याची देखील धमकी दिली जात होती. नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लग्न लावून दिले, त्यातच समोरील व्यक्तींकडून वारंवार होणारी पैशांची मागणी आणि ठार मारण्याच्या धमक्यांना मुलीचे वडील कंटाळलेले होते. याच कारणामुळे त्यांनी रविवारी सकाळच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.
