
जळगाव मिरर | ६ मार्च २०२५
राज्यात आता शाळांमध्येही मुली सुरक्षित नसल्याचा एक धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातून समोर आला आहे. एका मुख्याध्यापकाने तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थीनींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला. रवींद्र गव्हारे असे शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र गव्हारे हा रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने तिसरी आणि पाचवीच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनींना आपल्या केबिनमध्ये बोलावून घ्यायचा आणि मुलींसोबत लैंगिक चाळे करायचा. याबाबत बाहेर वाच्यता केल्यास शाळेतून काढून टाकण्याची आणि मारण्याची धमकी द्यायचा. आरोपीच्या धमकीमुळे घाबरल्याने मुलींना आपल्या आई-वडिलांना देखील शाळेत घडणाऱ्या प्रकाराबाबत सांगितले नाही. शाळेत मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे करत असलेल्या कृत्यामुळे अनेक मुलींनी शाळेत येणे टाळले होते. मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारले असता, मुलींनी घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर नराधम मुख्याध्यापकाचा चेहरा समोर आला. बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल याप्रकरणी एका पीडित मुलीच्या आईने लाहेरी पोलिसांत मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकावर बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कलमांखाली गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही गेल्या काही महिन्यांपासून मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. बदलापूर येथील एका शाळेत चिमकुल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुण्यातही एका स्कुलबस चालकाने चिमुकलींशी अश्लील चाळे केले होते. त्यावेळी नागरिकांचा रोष दिसला होता. मात्र, अद्यापही शाळा व कॉलेजेसमध्ये अशा घटना घडत आहेत. पालक मोठ्या विश्वासाने मुलींना शाळेत पाठतात. पण शाळेतच शिक्षकाकडून मुलींसोबत असे प्रकार घडत असतील, तर शाळेत तरी मुली सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतो. या घटनमुळे शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.