जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज नगर मधील रहिवासी व आई वडिलांचा एकुलता मुलगा हितेंद्र प्रकाश सोनार (३२) हा तरुण गुजरातमधील अंकलेश्वर येथे कंपनीमध्ये नोकरीस होता. कामावर जाताना १ जानेवारी रोजी त्याचा अपघातात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीस असलेल्या या युवकाचे एमएससी पर्यंत शिक्षण झाले होते पाच-सहा वर्षांपासून तो अंकलेश्वर येथील कंपनीमध्ये नोकरीला होता. वरणगाव येथे वृद्ध आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करीत असताना तो त्यांना अंकलेश्वर गुजरात येथे घेऊन गेला होता. तेथेच नोकरी करुन त्या व्यतिरिक्त फावल्या वेळेत तो फर्निचरची कामे करीत होता. अशाप्रकारे रात्रंदिवस मेहनत करून त्याने तेथे घरसुद्धा घेतले होते.
अडीच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला. त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. १ जानेवारी रोजी घरातून सहा वाजता नोकरीच्या ठिकाणी दुचाकीने जात असताना घरापासून काही अंतरावर मुख्य महामार्गावर त्याच्या दुचाकीला समोरून अज्ञात वाहनाने धडक दिली त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. परंतु रस्त्यावरील कोणीही त्याला मदत न केल्यामुळे तो त्याच ठिकाणी दीड तासांपर्यंत पडून राहिल्यामुळे त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव होऊन तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या आई- वडिलांना ही वार्ता तब्बल दीड तासांनी कळाल्यावर ते अपघातस्थळी दाखल झाले. त्याचा मृतदेह पडलेला पाहून त्यांनी हंबरडा फोडला, याचवेळी वरणगाव मूळ राहणारे महेंद्रसिंग राऊळ व त्यांचा मुलगा अमर राऊळ यांना घटना कळाल्याबरोबर ते अपघातस्थळी मदतीला धावून गेले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्याचा मृतदेह वरणगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत आणण्यात आला.