जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२६
शहरापासून नजीक असलेल्या कांताई बंधाऱ्यावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. आशुतोष दिलीप जोशी (वय २२, रा. गणेश नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नगर, जळगाव येथील रहिवासी असलेला आशुतोष जोशी याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो मंदिर व संस्थांच्यावतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजन व कीर्तन सादर करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी सकाळी तो आपल्या मित्रांसोबत कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी आशुतोषचे मामा शिवराज जोशी तसेच इतर नातेवाईकांनी त्याला बाहेर जाण्यास विरोध करत वास्तूशांतीच्या विधीसाठी सोबत येण्याची विनंती केली होती. मात्र मित्रांसोबत जाण्याचा निर्णय घेत तो बंधाऱ्यावर गेला.
आशुतोष हा सागर जयराम कटारिया (वय २२), सोमय्या राजेश जैस्वाल (वय १६) व राहुल चव्हाण (वय १६, सर्व रा. गणेश नगर) यांच्यासह पाण्यात पोहण्यासाठी उतरला. काठापासून काही अंतरावर गेल्यानंतर आशुतोष बुडत असल्याचे लक्षात येताच मित्र सोमय्या जैस्वाल याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र दोघेही बुडत असल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला.
या प्रयत्नात सोमय्या जैस्वाल याला वाचविण्यात यश आले; मात्र आशुतोष खोल खड्ड्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. मासेमारी करणारे व पट्टीचे पोहणारे यांनी सुमारे दीड तास शोध घेतल्यानंतर आशुतोषचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




















