
जळगाव मिरर | ३० मे २०२५
राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाड्यांचे गुणवत्तानुसार मूल्यमापन करण्यात येणार असून, त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.
तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली. या बैठकीस विभागीय सचिव, उपायुक्त संगीता लोंढे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. अंगणवाडी केंद्रांनी पूर्ण केलेल्या निकषांनुसार १४०० ते २००० रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.
– घरपोच आहार
– वृद्धी संनियंत्रण क्षमता
– पूर्व शालेय शिक्षण
– गरम ताज्या आहाराचे वितरण
– आहार व आरोग्य दिवस साजरा करणे
– पोषण उपचार व पुनर्वसन
– स्थूल व खुजी बालकांचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असणे
याशिवाय, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा मृत्यू झाल्यास किंवा निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले आहेत. ही योजना अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या योगदानाला ओळख देणारी ठरणार असून, त्यांच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अंगणवाडी केंद्राने १० पैकी ७ निकष पूर्ण केल्यास १४०० रुपये, ६ निकष पूर्ण केल्यास १६०० रुपये, ९ निकष पूर्ण केल्यास १८०० रुपये आणि १० निकष पूर्ण केल्यास २००० याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.