
जळगाव मिरर / ४ मे २०२३ ।
मुंबईसह अनेक परिसरात राहणाऱ्या खानदेशवासीयांसाठी चार दिवस चाललेल्या ग्लोबल खानदेश महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. चार दिवस चाललेल्या महोत्सावात खानदेशी कलासंस्कृती, खाद्यसंस्कृती व कृषिसंस्कृतीची पर्वणीच मुंबई परिसरातील खानदेशवासीयांसह इतरांनी अनुभवली.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी खानदेश भवन उभारणार असल्याचे घोषित केले, तर सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण यांनी खानदेशसाठी उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ स्थापनेची आणि नदीजोड प्रकल्पाची केलेली मागणी तर्कसंगत व न्यायसंगत असून, प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
महोत्सवाची सांगता खानदेशभूषण पुरस्कार वितरणाने झाली. या वेळी आमदार सत्यजित तांबे, आमदार राजूमामा भोळे, भाजप प्रदेश ओबीसी प्रकोष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक अर्जुन भोईर, नगरसेवक साईनाथ तारे, साधना गायकर, माजी नगरसेवक सुनील वायले, नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक जयवंत भोईर, पत्रकार शरद पवार, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सदस्य रवी पाटील, महेंद्र बोरसे, सरपंच सुनील पाटील आदी उपस्थित होते. चार दिवसांत लाखभर रसिक प्रेक्षकांनी महोत्सवाचा आनंद घेतला. सुमारे तीन कोटींहून अधिकची उलाढाल झाली. स्वागताध्यक्ष सुनील चौधरी, अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष प्रदीप अहिरे, खजिनदार ए. जी. पाटील यांनी समर्थपणे व सक्षमतेने एकहाती जबाबदारी सांभाळली. विनोद शेलकर, वर्षा पाटील व वैदेही पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिव दीपक पाटील यांनी आभार मानले. विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव व महिला आघाडीप्रमुख आदींनी कुशल संयोजन केले.
यांना खानदेशभूषण पुरस्कार
नवी मुंबईतील प्रतिष्ठित व प्रसिद्ध उद्योजक, मराठी पाऊल पडते पुढे चित्रपटाचे निर्माते प्रकाश बाविस्कर यांना खानदेश उद्योगरत्न पुरस्कार, खानदेशकन्या प्रतिभा शिंदे व दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांना खानदेशभूषण पुरस्कार, तर सांस्कृतिक विभाग सचिव मीनाक्षी पाटील यांना विशेष खानदेश पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.






















