
जळगाव मिरर | ६ जून २०२६

जामनेर तालुक्यात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या अवैध विक्रीप्रकरणी कृषी विभागाच्या कारवाईत १ हजार १६ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने दि. ३ जून रोजी पाठविलेल्या डमी ग्राहकास १ हजार संशयास्पद कापूस बियाणे पाकिटांची प्रत्येकी १२०० दराने विक्री करण्याचा व्यवहार पिंप्री.ता. धरणगाव येथे गुलाब आधार पाटील, भूषण पाटील व दीपक राजकमल चौधरी यांनी ठरविला होता. मात्र व्यवहार अंतिम टप्प्यात असताना पोलीस पाळत ठेवत असल्याचा संशय आल्याने संबंधितांनी बियाण्यांची विक्री न करता तेथून पलायन केले.
त्यानंतर कृषी विभागाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या मदतीने तांत्रिक तपास करून संबंधितांचा शोध घेतला. चौकशी दरम्यान प्राप्त माहितीनुसार जामनेर येथील दीपक राजकमल चौधरी यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. या कारवाईत एकूण १ हजार १६ संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे पाकिटे आढळून आली व ती जप्त करण्यात आली. बियाण्यांमधील एचटीबीटी जनुक व बीटी प्रोटीनची उपस्थिती तपासण्यासाठी पंचासमक्ष नमुने घेऊन प्रयोगशाळा विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. तपासादरम्यान प्राप्त जबाब व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित बियाणे कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी तुकाराम कोळी यांना देखील सहआरोपी करण्यात आले असून एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील प्रकरणाचा तपास परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्च्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला. या प्रकरणी कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राजेंद्र हेपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संबंधित चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनधिकृत, अप्रमाणित अथवा संशयास्पद कापूस बियाणे खरेदी न करण्याचे आवाहन केले असून, केवळ अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




















