
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई विमानतळाजवळील उड्डाणपुलावर एका कारने मध्यरात्री अचानक पेट घेतला. त्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे औरंगाबादचा दौरा अटोपून घरी जात होते. त्यादरम्यान त्यांनी पाहिले की, समोरच्या एका गाडीने पेट घेतला आहे. त्यानंतर ते लगेच आपल्या ताफ्यातून उतरले आणि चालकासोबत विचारपूस केली. गाडीपेक्षा जीव महत्वाचा असल्याचे म्हणत आपण गाडी नवीन घेऊ, असा धीरही त्यांनी यावेळी दिला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे मुख्यमंत्री असले तरी, त्यांच्यातील एक सामान्य कार्यकर्ता वेळोवेळी दिसून पाहायला मिळतो. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते राज्याच्या विविध भागात दौरे करत आहेत. काल त्यांची औरंगाबादच्या पैठण तालुक्यात जाहीर सभा झाली. त्यानंतर संध्याकाळी ते मुंबईच्या दिशेने परतले. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांनी जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते सातत्याने जनतेच्या मदतीसाठी तत्पर असल्याचेही अनेक वेळा दिसून आले आहे. अशीच काहीशी घटना विलेपार्ले येथे बघायला मिळाली. येथे भररस्त्यात एका दुचाकीने अचानक पेट घेतला. हे पाहून मुख्यमंत्री शिंदे क्षणाचाही विलंब न करता, आपला ताफा थांबवत संबंधित दुचाकीस्वाराच्या मदतीसाठी धावल्याचे दिसून आले होते.
गाडीने पेट घेतल्यानंतर चालक घाबरला होता. तसेच डोळ्यासमोर गाडी जळत असल्याने त्याचे डोळे देखील पाणावले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गाडीतून उतरून चालकाची भेट घेतली. त्यावेळी त्याला धीर देत आपण गाडी नवीन घेऊ, गाडीपेक्षा जीव महत्वाचा आहे, असे शिंदे म्हणाले.





















