
जळगाव मिरर / २३ मार्च २०२३ ।
गेल्या काही दिवसापासून राज्यात बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाचे थैमान सुरु होते त्यामुळे अनेक शेतकरीचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. आता राज्यात पुन्हा वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. आज गुरुवारी २३ रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, शुक्रवारपासून या भागांमध्ये विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामानात अनपेक्षित बदल होत आहेत. तापमान, बाष्प, ढगांची गर्दी व कमी हवेचा दाब निर्माण होईल तेथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या सकाळी ऊन व दुपारनंतर आकाशात ढग घोंगावतील. शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. विशेष करुन विदर्भात अवकाळी पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे तेथे पुढील आठ दिवस काही भागात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आकाशात उणे तापमान असेल तेथे गारपीटदेखील झाली. शुक्रवारीही ही स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
उत्तरेतील शीत वारे व पाऊस, गारपीट यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात बुधवारी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 5 अंशांनी घसरण झाली. कमाल तापमान 31.6 अंश सेल्सियसवर आणि किमान तापमानामध्ये 2 अंशांनी घट होऊन 19 अंश नोंदवले गेले.






















