जळगाव मिरर | संदीप महाले
शहराच्या हृदयस्थानी असलेल्या मुख्य बाजारपेठेतील बेशिस्त अतिक्रमण आणि बेसमेंट पार्किंगच्या खुलेआम होणाऱ्या गैरवापरामुळे जळगावकर अक्षरशः कोंडीत सापडले आहेत. वर्षानुवर्षे या बेकायदेशीर प्रकारांकडे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असताना, नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांच्या समोर हा प्रश्न राजकीय कसोटी ठरणार आहे.
मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून फुटपाथ, रस्ते आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण हे आता “सामान्य” झाले आहे. तर, महापालिकेच्या नियमांनुसार वाहनतळासाठी राखीव असलेली बेसमेंट पार्किंग जागा सर्रास गोदामे, दुकाने व व्यावसायिक वापरासाठी वापरली जात आहे. या सर्व प्रकारांना प्रशासनाचे मूक समर्थन असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, याआधी अनेक वेळा अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा कागदावरच राहिल्या. काही दिवसांची दिखाऊ कारवाई, नंतर पुन्हा ‘जैसे थे’ अशी परिस्थिती निर्माण झाली. यामागे राजकीय दबाव, व्यापारी संघटनांचा प्रभाव आणि सत्ताधाऱ्यांची अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे.
नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी जर खरोखरच शहरहिताला प्राधान्य दिले, तर अतिक्रमणकर्त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेवर कारवाई, बेसमेंट पार्किंगच्या वापराची कडक तपासणी आणि नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी लागणार आहे. अन्यथा, “नवे महापौर, पण जुनीच तडजोडीची भूमिका” असा ठपका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, आपत्कालीन वाहनांना अडथळे आणि नागरिकांचा वाढता रोष पाहता, आता केवळ आश्वासनांवर शहर चालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नागरिक व्यक्त करत आहेत. महापौर दीपमाला काळे या दबावाला झुगारून कठोर निर्णय घेणार, की अतिक्रमणाच्या राजकारणात अडकणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




















