
जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२५
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर तालुक्यातील नाद्री आणि पातोडा परिसरात नाल्याला मोठा पूर आला. या पुराचे पाणी जवळील भील व पारधी वस्त्यांमध्ये घुसल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असून जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्रीताई अनिल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पूरग्रस्त वस्त्यांमध्ये जाऊन स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी ताईंनी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून योग्य मदत व पुनर्वसनाची कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
जयश्रीताईंनी नुकसानग्रस्त कुटुंबांना धीर देत सांगितले की, “आपल्या अडचणी सरकार दरबारी पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल. कोणीही काळजी करू नये, प्रशासन आपल्या पाठीशी ठाम उभे आहे.” या पाहणी दौऱ्यात अनेक ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, समाजसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नाल्यांच्या साफसफाई व योग्य नियोजनाची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.




















