जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२६
वाशी तालुक्यातील तरुण जोडप्याचे लग्नाचे स्वप्न साकार होण्यापूर्वीच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या नववधू अक्षया सुनील चव्हाण (२३) आणि नवरा अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) यांचा दुर्दैवी मृत्यू सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर, रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोलवेच्या कमानीला कार धडकल्याने झाला. घटना रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया यांचा गत रविवारी मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी उत्साहात लग्नाची तयारी सुरू केली होती.
अपघाताच्या दिवशी नववधू अक्षया हिची महापरीक्षा लातूर येथे होती. सकाळी वाशी येथून टाटा नेक्सॉन (MH 25 BF 5064) कारने निघालेल्या दरम्यान, रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात थेट टोलवेच्या कमानीला धडकली. धडके इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत नववधू अक्षया सुनील चव्हाण आणि वर अक्षय रामभाऊ शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अक्षय यादव सिरसट (२२) गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच रत्नापूर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
साखरपुड्यानंतर फक्त काही दिवसांत झालेल्या या अकाली मृत्यूमुळे वाशी तालुक्यात शोककळा पसरली असून कुटुंबीय, मित्रमंडळी आणि स्थानिक नागरिक या घटनेवर खंत व्यक्त करत आहेत.





















