जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२६
पाळधी ते तरसोद सुरु असलेल्या बायपास महामार्गावर एकेरी वाहतुक सुरु आहे. मात्र त्याठिकाणी कोणताही सुचना फलक नसल्यामुळे दुसऱ्या मार्गावरील वाहने देखील तेथून जात आहे. त्यामुळे रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ट्रेलर व कंटेनरची समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या कॅबीनचा चुराडा होवून चालक गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तरसोद फाट्याजवळून काही अंतरावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापुर्वीच तयार झालेला पाळधी ते तरसोद बायपास महामार्ग पहिल्याच पावसामुळे खचला. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून धुळ्याकडून नागपूरकडे जाणारी एकच बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, एकेरी वाहतुक सुरु असतांना चंद्रपूर येथून लोखंडी अँगल घेऊन जाणार (एनएल ०१, एके ११०४) क्रमांकाचा ट्रेलर जळगाव शहरानजीक तरसोद गावाजवळ आला त्यानंतर ट्रेलर हा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून न जाता बायपासने गेला. एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने जात असताना समोरुन येणाऱ्या (एचआर ४७, एफ २५८१) क्रमांकाच्या कंटेनर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की, ट्रेलरच्या पुढील भागाच चुराडा होऊन कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे.
या भीषण अपघातात ट्रेलरचा चालक अंग्रेससिंग अरुंधवा (वय ५६, रा. रायपूर, छत्तीसगढ) याच्यासह ट्रेलरचा चालक जखमी झाला. यातील अरुंधवा यांच्य दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहनांनी एकमेकांना दिलेली धडक इतकी भीषण होती की, या धडकेत ट्रेलरची कॅबिन दबल्याने चालकाचे दोन्ही पाय स्टेअरींगखाली अडकून पडले होते. महामार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र चालकाल बाहेर काढता येत नसल्याने ६० ते ७० जणांन मिळून कॅबिनचा दरवाजा तोडून चालकाला बाहेर काढून त्याला लागलीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहराबाहेरुन गेलेल्या या बायपासवर अपघात झाल्यानंतर तालुका व नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मात्र दोघांकडून घटनास्थळाच्या हद्दीबाबत एकमेकांकडे बोट दाखविण्यात आले. या अपघाताबाबत संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता, त्यांच्याकडून हा अपघात आमच्या हद्दीत नसल्याचे सांगण्यात आले. या टोलवाटोलमध्ये रात्रीपर्यंत अपघातासंदर्भात कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा तर सोडाच साधी नोंद देखील झालेली नव्हती.




















