
जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२६
धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी व परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) पहाटे पाच वाजल्यापासून मोठी धडक कारवाई राबवून तब्बल ४० वाहने जप्त केली. यामध्ये ३२ ट्रॅक्टर, ८ ट्रक व डंपरचा समावेश असून सर्व वाहने पोलिस मुख्यालय परिसरात उभी करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये वाळू आढळून आलेली नसली तरी कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा व तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई हाती घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार पहाटेच पथक बांभोरी गावात दाखल झाले.
गावातील अनेक नागरिक झोपेत असतानाच गल्लीबोळातून फिरत पथकाने संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. ज्या वाहनांवर यापूर्वी वाळू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत, अशा वाहनांचा शोध घेण्यात आला. तसेच वाळू वाहतूक होत असल्याचा संशय असलेल्या ट्रॅक्टर, ट्रक व डंपरची चौकशी करून ती ताब्यात घेण्यात आली. जप्तीची कारवाई करताना आवश्यक असल्यास वाहने सुरू करण्यासाठी चावी तयार करणारा कारागीरही पथकासोबत होता.
पहाटे अचानक गावात मोठा फौजफाटा दाखल झाल्याने काही काळ ग्रामस्थांनाही काय सुरू आहे, हे समजले नाही. सकाळी १० वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान, एरव्ही सुसाट वेगाने धावणारी हीच वाहने पोलिस नेत असताना देखील भरधाव चालविण्यात आल्याची तक्रार काही दुचाकीस्वारांनी केली. त्यामुळे काहींना रस्त्याच्या कडेला उतरावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
वाळू उपसा रोखण्यासाठी जप्त केलेल्या वाहनांची कागदपत्रे तपासली जात असून संबंधितांकडे वैध वाळू वाहतूक परवाना आहे का, याची खात्री केली जात आहे. परवाना नसल्यास किंवा पूर्वीचे गुन्हे असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच कागदपत्रे अपूर्ण असलेल्या वाहनांबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देण्यात आले आहे. अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, पुढील काळातही अशी धडक मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




















