
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर मंगळवारी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावकरांसाठी काही ठोस आश्वासने दिली नाहीत. जिल्हावासीयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी शिवसेनेतर्फे महानगरपालिकेसमोर मुख्यमंत्र्यांना गाजर दाखवा आंदोलन केले. मीनाताई ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिकांनी माजी मंत्री रामदास कदम व आमदार शहाजी पाटील यांच्या प्रतिमांना जोडे मारत आंदोलन करुन त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपाचे विरोधीपक्षनेते सुनील महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आंदोलन केले. मीनाताई ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांना संयम ठेवण्याच्या सूचना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री त्यांच्या दौऱ्यात जळगावकरांच्या तोंडाला पाने पुसून गेले. अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ मिळाला नाही. विविध भागात अतिवृष्टी झाली. हंमामी पैसेवारी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई याबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. कोणतेही पॅकेज जाहीर केले नाही. जळगाव शहरातील नागरिकांनी खड्डेमुक्त जळगाव झाले पाहिजेत, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री निधी देतील, अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री जिल्हावासीयांना गाजर देवून गेले. त्यामुळे शिवसेनेने त्यांना गाजर दाखवले असल्याचे जिल्हाप्रमुखांनी सांगितले.
ठाकरे कुटुंबीयांच्या भरवशावर कदम शाखाप्रमुख, नगरसेवक, दोन वेळेस विधानपरिषदेवर आमदार, परिवहन व पर्यटन मंत्रीपद मिळाले.यावेळेस त्यांना विधानपरिषदेवर जाता आले नाही. त्यावेळेस त्यांना जाग आली. त्यामुळे त्यांनी बेताल वक्तव्य केले आहे. त्याचा जळगाव जिल्हा व महानगर शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. आगामी काळात असे बेताल वक्तव्य कराल, रामदास कदम जळगावात या, शिवसैनिक काय आहेत ते तुम्हाला दाखवून देवू, असे आव्हान जिल्हाप्रमुख भंगाळे यांनी दिले आहे. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांचाही निषेध व्यक्त करण्यात आला.




















