
जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६
बोदवड तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे प्रेमविवाह केल्याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचा पुरावा न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच दीपक कोळी याच्याशी संबंधित अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघांनीही घरातून पळून जाऊन बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे एका संस्थेमार्फत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदविली होती.
दरम्यान, काही दिवसांनी संबंधित तरुण व मुलगी पोलिसांसमोर हजर झाले. त्यांनी विवाह केल्याचा दावा करत त्याबाबतची कागदपत्रे सादर केली. मात्र, तपासादरम्यान मुलगी १८ वर्षांखालील असल्याचे स्पष्ट झाले.
मुलीच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेत मुलीचे वय १७ वर्षे ११ महिने असल्याचा अधिकृत पुरावा सादर केला. अल्पवयीन मुलीचा विवाह कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरला जाऊ शकत नसल्याने न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




















