जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२६
तेलगी प्रकरणानंतर स्टॅम्प सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्यात आल्या असतानाही बनावट स्टॅम्पचा गैरप्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून देशभर विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग (मा.रा.आ.) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बिहार व दिल्ली येथून आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २७ लाख ८४ हजार २०० रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुंबईतील राकेश बिंद, बिहारमधील शमशोद्दीन गफार व शाहिद रजा, दिल्लीतील मोहम्मद शहाबुद्दीन शेख तसेच गाझियाबाद येथील विरेंदर प्रसाद यांचा समावेश आहे.
१२ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई जी.पी.ओ.चे डाक निरीक्षक आशुतोष जमादारसिंह कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मा.रा.आ. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण तसेच जी.पी.ओ. कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही टोळी बनावट पोस्टल स्टॅम्प छापून कुरिअरमार्फत विविध राज्यांत पाठवत असल्याचे निष्पन्न झाले.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी केली असता ७ ते ८ कोटी रुपयांची संशयास्पद आर्थिक उलाढाल आढळून आली आहे. या रकमेवरून हा गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस आता या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी अटकेच्या भीतीने वारंवार मोबाईल क्रमांक व वास्तव्य बदलत असल्याने तपासात अडथळे येत होते. अखेर पोलिस पथकाने दिल्लीत सलग १४ दिवस पाळत ठेवून गोपनीय कारवाई करत आरोपींना अटक केली. या मोठ्या कारवाईमुळे देशभरात गाजलेल्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा तपास अधिक व्यापक करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.




















